मागील दोन-तीन वर्षांपासून शिरपूर व परिसरात जून ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मागीलवर्षी १ जून ते १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत १२२२ मिलिमीटर पाऊस पडला होता. मागीलवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा होती. यंदाही जून महिन्यापासूनच शिरपूर परिसरात जोरदार पर्जन्यमान होत आहे. जूनमध्ये ३५७ मिलिमीटर, जुलैत २८९, ऑगस्टमध्ये १४१, तर २४ सप्टेंबरपर्यंत २१३ मिलिमीटर इतका पाऊस पडल्याने आतापर्यंत १००० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापक गजानन वाढे यांच्याकडे करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील अढोळ प्रकल्प जुलै महिन्यापासून ओसंडून वाहू लागला आहे, तर मिर्झापूर प्रकल्पही मागील दोन-तीन दिवसांपासून ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.
--------------
पिके संकटात, शेतकरी चिंताग्रस्त
शिरपूर जैन येथे मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सलग तिसऱ्यावर्षीही सोयाबीन काढणीला आले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सोयाबीनचे पीकही संकटात आल्याचे दिसत आहे.