वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी होऊ घातलेली पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची मनधरणी करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. असे असताना पाऊस थांबत नसल्याने मतदारांना गाठावे कसे, असा प्रश्न उमेदवारांसमक्ष उभा ठाकला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण होत असल्याचा मुद्दा समोर करून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करून पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय दिला. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.
जिंकण्याचा इरादा पक्का करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी याआधी डोअर टू डोअर भेटीवर भर दिला; मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावांमधील पिकांची अतोनात हानी झाली आहे. त्या विवंचनेत शेतकरी सापडले असून इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी मात्र यामुळे पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
.........................
निवडणूक ठेवा बाजूला, आधी नुकसानीचे पाहा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात बाजी मारायची असेल तर मतदारांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काही उमेदवार चिखल तुडवत आपापल्या सर्कलमध्ये धडकत आहेत; मात्र निवडणूक ठेवा बाजूला आधी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे काही होते का ते पाहा, असा सूर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून उमटत आहे.