महावितरण वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बांधिल असली तरी वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा करायला हवा; परंतु तसे होताना दिसत नाही. महावितरणचा डोलारा चालवायचा असेल तर वितरित केलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कृषीपंप, पथदिवे आणि ग्रामपंचायतींची १८ कोटी १७ लाख थकबाकी वगळता वाशिम जिल्ह्यात ४१ कोटी ४५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीमही राबविली, परंतु २५ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी केवळ १३ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची वसुली जिल्ह्यात होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित २७ काेटी ९३ लाखांची थकबाकी वसूल कशी करणार, असा प्रश्न आहे. ही थकबाकी वसूल व्हावी म्हणून थकबाकीदारांकडून सहकार्य न मिळाल्यास कारवाई करण्याचा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे.
-----------------
प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला उद्दिष्ट
महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी प्रचंड वाढल्याने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात अधिकाधिक वसुली होण्याच्या उद्देशाने प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. एवढेच नाही तर वसुली मोहिमा व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याने या मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे.
----------------------
तालुकानिहाय थकबाकीचे उद्दिष्ट आणि वसुली (लाखांत)
तालुका - उद्दिष्ट - वसुली
कारंजा - ९३०.०० - ३१८.८३
मालेगाव - ५.६० - १२५.०२
मं.पीर - ५.०० १४२.५४
मानोरा - ३.४४ ७१.६८
रिसोड - ६.४६ १२७.६६
वाशिम - ११.६५ ३७३.५२
---------------------
एकूण ४१.४५
-----------------
कोट : वाशिम जिल्ह्यास कृषी पंप, पथदिवे आणि ग्रामपंचायतीची थकबाकी वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी ४१.३५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा कारवाईचा पवित्रा घ्यावा लागेल.
-रत्नदीप तायडे,
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम