वाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे पूल खचले आहेत. त्यात काही पूल पूर्णपणे खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि वाशिम तालुक्यातील देपूळसह इतर पुलांचा समावेश आहे. हे पूल दुर्लक्षित असल्याने शेतकरी, वाहनचालकांना अडचणी येत असल्याने ते पूल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहॉगिर ते देपूळ रस्त्यादरम्यानच्या नाल्यावरील पूल खचला. यामुळे या रस्त्याची वाहतूक बंद झाली असून, शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडण्यासह इतर अडचणीही त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. तेव्हा या पुलाचे नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी जि. प. सदस्य अर्चना डिगांबर खोरणे यांनी सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे गत महिन्यात निवेदनाद्वारे केली. शिवाय मानोरा तालुक्यातील इंझोरी-पिंपळगाव रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी पावसामुळे पूर्णपणे खचला असल्याने ३५ शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.