देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भाचा दौरा केला. यादरम्यान ९ जानेवारी १९१७ ला ते कारंजाला आले. कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी त्यानंतर झालेल्या जंगल सत्याग्रहात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांचाही समावेश होता. त्यांना कारावासदेखील भोगावा लागला.
१७ नोव्हेंबर १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हेही कारंजात आले होते. १९४२ मध्ये उफाळून आलेल्या ‘चले जाव’च्या चळवळीत जे.डी. चवरे विद्यामंदिरचे शिक्षक देवराव पासोबा काळे यांनी मुख्य चौकात इंग्रज सरकारविरुद्ध भाषण दिल्याने त्यांना १३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याच शाळेचे विद्यार्थी अवधूत शिंदे आणि उत्तमराव डहाके यांनीही तुरुंगवास भोगावा लागल्याचा उल्लेख आढळतो. या चळवळीतील २० स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेला दगडी खांब स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. आता तो जेसिज गार्डनमध्ये हलविण्यात आला आहे.