वाशिम : उच्चांकी सोयाबीनचे भाव कमी झाल्याने शेतकरी संतापले अन् त्यांनी थेट कारंजा तहसीलवर धडक देऊन तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन राेष व्यक्त केला.
मार्च महिन्यात साेयाबीनचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपये होते. आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला येण्याअगोदर एकदम भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी राेष व्यक्त केला आहे. आताच्या भावाने साेयाबीन विक्री केल्यास शेतीला लागलेला शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कारंजा तालुक्यातील बेबळा येथील शेतकऱ्यांनी कारंजा येथील तहसीलदार धीरज मांजरे यांना भेटून निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या अडचणी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, शेतकऱ्यांच्या साेयाबीनला भाव मिळवून द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा विशाल जोगींसह शेतकऱ्यांनी दिला आहे. किमान ६५०० च्या पुढे हमीभावात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विशाल घोडे, विशाल जोगी, रमेश अलाटे, सचिन अलाटे, विलास काळेकर, नरेंद्र जवंजाळ, नरेंद्र ठाकरे, इस्माईल शहा, शरद पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.