वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिजिटल करण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले, मात्र यामध्ये बळीराजाला अनंत अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने या अडचणी तातडीने सोडवाव्या, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले आहेत.
शासनाने पीकपेरा नोंदविण्यासाठी यावर्षी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीकपेरे नोंदविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र बळीराजाला यामध्ये अडचणी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राईड मोबाइल नाहीत तसेच ग्रामीण भागातील मोबाइल नेटवर्कची समस्या निर्माण होत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नाही. यामध्ये झाडांची नोंद करता येत नाही अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना पीकपेरा नोंदवायचा राहिला तर पुन्हा शेतकऱ्यांनाच त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात तसेच तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश खा. भावनाताई गवळी यांनी प्रशासनाला दिले आहेत.