वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यादरम्यान कामात अडथळा ठरू पाहणारी शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठी वृक्ष कटर मशीनच्या सहाय्याने तोडून रस्ते साफ करण्यात आले. यामुळे आजमितीस रस्त्यांचा विकास झाला; मात्र वाटसरूंना शीतल छाया देणारे वृक्ष नेस्तनाबूत झाल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला तडा गेल्या. मोप येथे मात्र हा प्रकार कटाक्षाने टाळण्यात आल्याचे दिसून आले.
गजानन नरवाडे यांनी आठ वर्षांपूर्वी मोपच्या बसथांब्यानजीक वट वृक्षारोपण केले होते. त्याचे काळजीपूर्वक संवर्धन केल्याने वृक्षाची वाढ झपाट्याने झाली. अशात सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यास अडथळा ठरत असल्याने वटवृक्ष तोडण्याचा निर्णय झाला; मात्र नरवाडे यांनी त्यास विरोध करून स्वखर्चाने ‘जेसीबी’ लावला व वटवृक्ष सुरक्षितरित्या मुळासकट काढून तो भर जहागीर येथील स्मशानभूमीत जसाच्या तसा लावण्यात आला. राधिका गणेश नरवाडे या छोट्या मुलीच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.