शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते; अन्य ऋतूंमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
........................
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे विविध स्वरूपातील संसर्गजन्य आजार पसरतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार जडण्यासोबतच सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे काविळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात.
...............
पाणी उकळून प्यायलेले बरे
उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोमट पाणी अनेक आजारांपासून शरीराला सुरक्षित ठेवते. सकाळच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर अनशापोटी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एका तासाने कोमट पाणी प्याल्याने कफ व पोटाचे विकार नाहीसे होतात.
..................
आजाराची लक्षणे
दूषित पाणी प्याल्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शाैचास होण्याचा विकार जडू शकतो. त्यास अतिसार म्हणतात.
दूषित पाणी तसेच अन्नपदार्थांमधून पसरणारी कावीळ वर्षभर असते ; मात्र पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.
उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणेही दूषित पाण्यातून दिसून येतात. त्यास गॅस्ट्रो म्हणून संबोधण्यात येते.
पोलिओ आणि विषमज्वर यासारखे आजारही दूषित पाणी पिण्यात आल्याने होतात.
....................
वाशिमकर दररोज पितात १० दलघमी पाणी
वाशिम तालुक्यातील केकतउमरा गावानजिकच्या एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना नळाव्दारे १० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दरडोई १२५ लीटर पाणी पुरविण्यात येते. पाणी शुद्धीकरणाची रीतसर प्रक्रिया राबवूनच निर्जंतुक झालेले पाणी नळाव्दारे पुरविण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे पंकज सोनोने यांनी दिली.