वीज देयक थकीत असल्याने काजळेश्वर
परिसरातील कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जोडण्या खंडित करण्यात आल्यामुळे भाजीपाल्यासह रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकरी वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काजळेश्वर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे वीज देयक थकीत आहे. परिसरात मुबलक जलसाठा असल्याने यंदा रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन ही थकबाकी भरण्याचा विचार शेतकरी करीत होते, परंतु पिके जोमात असतानाच महावितरणकडून शेतकऱ्यांची वीजजोडणी खंडित करण्यात आली. त्यामुळे सिंचन अभावी ही पिके संकटात सापडली असून, महावितरणबद्दल शेतकरी वर्गात रोषाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.