वाशिम : कारंजा तालुक्यातील भडशिवणी येथील सुनील ईसळ (३६) याने महिनाभरापूर्वी घरगुती वादानंतर पत्नीकडे १० महिन्यांचा मुलगा न देता पोबारा केला. याप्रकरणी दारव्हा दिवाणी न्यायालयाने कारंजा ग्रामीण पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्च वॉरंटही दिले; परंतु अद्यापही वाशिम पोलीस आरोपीचा शोध लावू शकले नाहीत. याप्रकरणी फिर्यादी गौरी ईसळने वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही निवेदन दिले आहे.
गौरी सुनील ईसळ (३२), रा.भडशिवणी, ता. कारंजा हल्ली मुक्काम अंबिकानगर, दारव्हा, या विवाहितेला तिचा पती आरोपी सुनील रुखबदास ईसळ हा मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. जुलै महिन्यात त्याने गौरी ईसळ हीस मारहाण केली. त्यावेळी माहेरच्या मंडळीने तिला दारव्हा येथे नेले असता आरोपीने गौरी हिचा १० महिन्यांचा मुलगा मल्हार यास तिच्याकडे दिले नाही, तसेच ते गेल्यानंतर आरोपीने गौरीच्या माहेरकडील मंडळीविरोधात पोलिसांत फिर्याद दिली, तर फिर्यादीनेही मल्हार ईसळ हा आरोपी सुनील ईसळच्या ताब्यात आहे की नाही, त्याचा शोध घेण्याची मागणी केली होती. यावर दारव्हा येथील दिवाणी न्यायालयाने कारंजा पोलिसांना मल्हार ईसळ या चिमुकल्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. कारंजा पोलीस मल्हार ईसळचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे दारव्हाच्या दिवाणी न्यायालयाने वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावर कारवाईचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांनी तातडीने कार्यवाही करीत मल्हारचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले; परंतु अद्यापही पोलीस मल्हारचा शोध लावू शकले नाहीत.
------------
मल्हारची कस्टडी मातेला देण्याचे आदेश
वाशिम जिल्हा पोलीस सुनील ईसळचा शोध घेऊन मल्हार इसळला त्याच्या मातेच्या सुपुर्द करू शकले नाहीत. अखेर या प्रकरणावर दारव्हाच्या दिवाणी न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी मल्हारची कस्टडी त्याच्या मातेला देण्याचे आदेश वाशिम जिल्हा पोलिसांना देतानाच एक प्रोटेक्शन ऑफिसर नियुक्त तातडीने करण्याचे आदेशही दिले. अंमलबजावणी म्हणून प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती केली आहे.