यासंदर्भात १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली, महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यातील ६,९६५ खातेदार शेतकऱ्यांचे ४९९८.३२ हेक्टरवरील हरभरा, कांदा बियाणे, भाजीपाला, गहू, फळपिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले. हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. असे असताना शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत आजही कुठलाच विचार झालेला नाही.
गेल्यावर्षी खरीप हंगामात पीक विमा हप्ता भरणारे शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. ऑॅनलाईन दावे दाखल केलेल्या काहीच शेतकऱ्यांना विमा कंपनीने मोबदला दिला; परंतु अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरी छदामही मिळाला नाही. दरम्यान, शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या मार्गदर्शनात येत्या १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले जाणार आहे. त्यात शेतकरी व ‘भूमिपुत्र’च्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, देव इंगोले, संतोष सुर्वे, उत्तमराव आरू, श्रीरंग नागरे, नागेश इंगोले, भूषण मुराळे, विजय सावके, बाळू रोकडे, रामेश्वर बोरकर, अंकुश पाथरकर, सचिन काकडे यांनी केले आहे.