कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. क्रीडा क्षेत्र ही त्यास अपवाद राहिले नाही. दरम्यान, गतवर्षी वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत गेली. सद्यस्थितीत कोरोना बाधितांचा एकूण आकडा १४ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. कोरोना संसर्गापासून विद्यार्थी सुरक्षित राहावे, यासाठी गतवर्षी नवे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आले नाही. यासह गर्दी टाळण्यासाठी खेळांची मैदाने ही बंद ठेवण्यात येऊन जिल्हास्तर, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजनच करण्यात आले नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीमधील खेळाडू विद्यार्थी यंदा क्रीडा सवलत गुणास मुकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासन त्यावर काय तोडगा काढते, याकडे खेळाडूंसह क्रीडा शिक्षकांचेही लक्ष लागून आहे.
.....................
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे यंदा शाळा सुरू झाल्या नाहीत. यासह कुठल्याही क्रीडा स्पर्धा देखील झालेल्या नाहीत. यामुळे क्रीडा गुण सवलत मिळणार नाहीत. शासनाने २०१९ मधील क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेले प्रावीण्य विचारात घ्यावे व खेळाडूंना न्याय द्यायला हवा.
- महेश शिंदे
...........................
केवळ दहावीत क्रीडा सवलत गुण मिळतात म्हणून नव्हे; तर पूर्वीपासूनच खेळाची आवड आहे. नववीत असताना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मी सहभागी झालो होतो. त्याचा विचार करून दहावीत क्रीडा सवलत गुण मिळायला हवे.
- गणेश खंडाळकर
......................
खेळाडू विद्यार्थी अभ्यासासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी सकाळ-सायंकाळ मैदानावरही राहतो. मी देखील त्यापैकीच एक आहे. गतवर्षी कोरोनामुळे एकही स्पर्धा होऊ शकली नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने सर्वसमावेशक निर्णय घ्यायला हवा.
- अमोल कांबळे
........................
कोरोनामुळे प्रचंड नुकसान झालेल्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळणे आवश्यक आहे. अभ्यास सोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये दिलेले योगदान लक्षात घेता विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळायलाच हवे. यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.
- सिद्धार्थ गायकवाड
.......................
वाशिम शहरासह आसपासच्या खेडेगावात अनेक गुणी खेळाडू गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मैदान गाजवत आहेत. गतवर्षी मात्र कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यामुळे दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळणार नसतील तर ते अयोग्य आहे.
- बाळासाहेब गोटे
क्रीडा प्रशिक्षक
............................
दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळण्यासंदर्भात शासनस्तरावर ऊहापोह सुरू आहे. २०१९ मधील क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचा विचार होऊ शकतो. शासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये.
- किशोर बोंडे
क्रीडा प्रशिक्षक