वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला त्यात विशेष प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाभरातील ग्रामपंचायत सरपंचांनी दिली. जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात स्वच्छताविषयक कामांचा ऊहापोह झाला. त्यात सरपंचांनी हा निर्धार बोलून दाखविला.
याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम म्हणाले की, जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम् अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होण्याकरिता सांडपाणी व्यवस्थापन आणि शोषखड्ड्यांची निर्मिती केली जाणार आहेत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे सरपंचांच्या सहभाग व सहकार्याशिवाय शक्य नाहीत, असे ते म्हणाले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी, पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी चर्चेत सहभाग घेऊन जिल्हाभरात स्वच्छताविषयक कामांचा जागर करण्याचा निर्धार बोलून दाखविला. यावेळी माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, आदींनी मार्गदर्शन केले.