वाशिम : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार नवनविन निर्देशसुद्धा जारी करण्यात येत आहेत. १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार लग्नात ५० तर अंत्यविधीस २० लोकांना मुभा देण्यात आली आहे. यावरून सुखात सर्वच सोबत असतात दु:खात मात्र कोणीच नसते, अशी ‘काल्पनिक’ विचारसरणी यावरून अधोरेखीत होताना दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या अनुषंगाने जिल्हा प्रशासन दर आठवड्याला नवीन निर्देश जारी करताना दिसून येत आहे. मार्च महिन्यापासून लग्नाचा धुमधडाका सगळीकडेच सुरू होत असतो. अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की किमान एक हजार पाहुणे मंडळी तरी एकत्र येतातच. तर दुसरीकडे कुणाचा अंत्यविधी असला तर त्या अंत्यविधीलाही किमान पाचशे- सहाशे आप्तस्वकीय एकत्र येत असल्याचे चित्र जवळपास सगळीकडे सारखेच आहे.
सुख-दु:खाच्या कार्यक्रमामध्ये जास्त गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी तीव्र रूप धारण करू नये, यासाठी या संसर्गजन्य महामारीला वेळीच योग्य निर्बंध घालण्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव हा आटोक्यात आणण्यासाठी लग्न समारंभात ५० तर अंत्यविधीला २० लोकांनाच परवानगी दिली आहे. आणि ही परवानगी योग्यच आहे. असे असले तरी संचारबंदीच्या काळात एकत्र गप्पागोष्टी ज्यावेळी रंगतात त्यावेळी मात्र या निर्णयाला थेट ‘गोपी’ या हिंदी चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या ‘सुख के सब साथी दु:ख मे न कोई’ या गिताची आठवण करून देताना बघावयास मिळत आहे.