संतोष वानखडे/वाशिम: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गतच्या रुग्णवाहिकेने २0१४-२0१५ या वर्षात राज्यातील एक लाख ८४ हजार रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवून जीवनदान दिले आहे. राज्यभरातून दोन लाख कॉल नियंत्रण कक्षाला आले होते, हे विशेष! गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी राज्यात २६ जानेवारी २0१४ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू झाली आहे. राज्यात कोठूनही १0८ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला की तातडीने मोफत रुग्णवाहिका घरपोच येते. राज्यभरात प्रत्येक ३0 ते ४0 किलोमीटर अंतरावर या सुसज्ज अँम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) तैनात करण्यात आलेल्या आहेत. अँडव्हान्स लाईफ सेव्हिंग सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या या अँम्ब्युलन्स आहेत. एएलएस अँम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास तातडीचे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. घर ते हॉस्पिटलदरम्यान या अँम्ब्युलन्समध्ये उपचार केला जातो. या अँम्ब्युलन्समध्ये कार्डियाक मॉनिटर, डिफिब्रिलेटर मशीन, सिरिंज पंप, व्हेंटिलेटर, ईसीजी मशीन, अँम्ब्युबॅग, पल्स ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिकल सक्शन मशीन, इर्मजन्सी डिलेवरी किट, इंट्युबेशन किट, ऑक्सिजन सिलिंडर आदी आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट अँम्ब्युलन्सचा वापर हा घात, अपघातातील जखमी, जळीत रुग्ण, प्रसूती वेदना होत असलेल्या स्त्रिया, विषबाधा, सर्पदंशाच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केला जातो. २0१४-१५ या वर्षात राज्यभरातील एक लाख ८४ हजार ३९0 रुग्णांनी या मोफत रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये हृदयविकाराचे १९७८ रुग्ण, अपघातग्रस्त २६ हजार ८८९, प्रसुती ५२ हजार ४५३ तर इतर एक लाख तीन हजार ७0 रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णवाहिका सेवेचा १.८४ लाख रुग्णांना लाभ
By admin | Updated: April 24, 2015 02:01 IST