वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती २ दिवसांपूर्वी झाली. परंतु, सभापतीपदाची निवड मात्र करण्यात आली नाही. त्यामुळे कोणाला हे पद मिळेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली. या महासभेत विरोधी पक्षनेता, विविध विषय समितीचे सभापती यांच्या नियुक्त्या करण्यात येतील, असा सर्वसाधारण अंदाज होता. मात्र, या महासभेमध्ये केवळ २ समित्यांवरील सदस्यांची निवड झाली. त्यामुळे आता या २ समित्यांचे सभापती कोण, अशी चर्चा रंगात आली आहे. स्थायी समितीसाठी प्रकाश रॉड्रिग्ज व नितीन राऊत या दोघांची नावे चर्चेत आहेत. प्रकाश रॉड्रिग्ज हे तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष होते, तर नितीन राऊत यांनीही नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. गेली ५ वर्षे ते महानगरपालिकेच्या ‘ई’ प्रभाग समितीचे सभापती होते. या दोघांपैकी एकाची निवड स्थायी समिती सभापतीपदी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी विरारच्या नगरसेविका कांता पाटील व काँग्रेसमधून बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून निवडून आलेल्या छाया पाटील या दोघींपैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता आहे. कांता पाटील या तत्कालीन विरार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होत्या, तर छाया पाटील या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक असून दोनदा नगरसेविका म्हणून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पुन्हा निवडून आल्या. यंदा निवडणुकीपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवली व त्या चांगल्या मताधिक्क्याने पुन्हा निवडून आल्या. अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते. (प्रतिनिधी)
सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 22:15 IST