वसई : आज वसई-विरारच्या बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या कांद्याची आज १०० रु पये किलो दराने विक्री होत होती. या दरवाढीचा परिणाम विक्रीवरही जाणवल्याचे अनेक कांदा विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे औषधी म्हणून ओळख असलेला वसईचा सुप्रसिद्ध पांढरा कांदाही बाजारातून गायब झाला आहे. कांद्याच्या उसळीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला तो परवडेनासा झाला आहे.मान्सूनपूर्व पडलेला अवकाळी पाऊस तसेच मोसमी पावसाने दिलेल्या ओढीमुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या शेतीवर झाला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. यामुळे आवक व विक्री यामधील तफावतीमुळे कांद्याने भाव खाल्ला आहे.सणासुदीच्या काळात वसई-विरारच्या बाजारात भाजीपाल्याचेही दर आकाशाला भिडले आहेत. श्रावणात साधारण भाजीपाला स्वस्त असतो. मात्र, यंदा हे गृहीतकही मोडीत निघाले आहे. कांदा विक्रेत्यांनी आज सकाळपासून १०० रुपये किलो या दराने तो विकण्यास सुरुवात केल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले नसेल तरच नवल. वसई-विरार परिसरात वाशी, नाशिक व वसईच्या ग्रामीण भागामधून कांदा विक्रीसाठी येत असतो. वसईच्या भुईगाव व कळंब या भागात पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.परंतु, काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे औषधी म्हणून ओळख असलेला हा पांढरा कांदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यंदा पांढरा कांदा बाजारात पाहावयास मिळाला नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे विक्रीवरही त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पूर्वी ग्राहक दीड ते दोन किलो एका वेळी कांदा खरेदी करत असत, ते प्रमाण आता पाव किलो व अर्धा किलोवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच विक्रेतेही हैराण झाले आहेत.
वसईत कांदा १०० रुपये किलो
By admin | Updated: August 22, 2015 22:25 IST