तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे, चाबके तलावली, कोंडगाव, विळशेत आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीतून रिलायन्स कंपनीची पाइपलाइन टाकण्यांत आलेली असल्याने त्यामध्ये येथील शेतकऱ्यांच्या जमीनी त्यामध्ये गेल्या आहेत़ त्यामुळे जमीनीतील झाड-झाडोरा, बांध पूर्णपणे तोडून सपाटीकरण करण्यात आले व त्यावेळेस कंपनीकडून शेतकऱ्यांना पूर्णपणे भरपाई बरोबरच दुरुस्ती व बांधबंदिस्ती करुन देण्याची हमी देण्यात आली होती़ मात्र काही शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आली तर काहींना अजूनही पूर्वीचीभरपाई मिळालेली नसतांनाही आता पुन्हा पूर्वीच्या पाइपलाइन लगत दुसरी लाइन टाकण्याचे काम करण्यांत येणार असल्याच्या नोटीसा या कंपनीकडून शेतकऱ्यांना आलेल्या असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हरकती मागविल्या असल्याचे कुंर्झे पैकी धोडीपाडा येथील शेतकऱ्यांनी माहिती देतांना सांगितले़ त्यामुळे आता पुन्हा गॅस पाइपलाइन टाकण्यापूर्वी पूर्वीची व आताची अशी भरपाईची रक्कम प्रथम द्यावी व नंतर काम चालू करावे असे पत्र कंपनी व संबधीत विभागाच्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांची दिले आहे़ या पाइपलाइनचे काम पेट्रोलिअम अॅन्ड मिनरल्स पाईपलाईन (अॅक्विझिशन आॅफ राईट आॅफ युजर इन लॅन्ड) अॅक्ट सन-१९६२ नुसार केंद्रशासना मार्फत नियुक्त करण्यांत आलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत होत असते़ (वार्ताहर) आमच्या कुटुंबियांच्या व माझ्या शेतातून यापूर्वी पाइपलाईन गेलेली असन त्यामध्ये नुकसान झालेल्या जमीनीची व झाड झाडो-यांची तसेच इतर वस्तुची भरपाई अदयाप मिळालेली नाही व आता पुन्हा दुसरी नविन पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यांत येणार आहे़ तिला आमची हरकत असून प्रथम आमची पुर्वीची व आताची नुकसान भरपाई द्यावी नंतरच काम चालू करावे़ - गोविंद धोडी, शेतकरी कुंर्झे गांव धोडीपाडा
रिलायन्सच्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध
By admin | Updated: January 13, 2016 00:24 IST