बोईसर : तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (बी.ए.आर.सी.) ए.एस.एफ.एस.एफ या प्लांट उभारणीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या घिवली गावातील वीस कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून गावातील एकूण सत्तर कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. येत्या दहा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास घिवली गावाच्या वतीने बीएआरसी तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन आणि तीन व चार या सर्व प्रकल्पांतील कामगारांचा मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मागील चार महिन्यांपासून या वीस कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात एल अॅण्ड टी च्या व्यवस्थापनाशी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या. परंतु, काहीही ठोस मार्ग न निघाल्याने घिवलीच्या कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. कामगारांच्या या आंदोलनाला घिवलीच्या ग्रामस्थांनीही पाठिंबा देऊन एल अॅण्ड टी साठी सुरू असलेल्या गावातील दोन जीपगाड्या व एक बसही या बंदमध्ये सहभागी झाल्याने एल अॅण्ड टी च्या सुमारे चारशे परप्रांतीय कामगारांना आज कामावर जाता आले नसल्याचे घिवलीचे शिवसेना शाखाप्रमुख शैलेश मोरे यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून घिवली गावचे सरपंच भुवनेश्वर हिलीम, उपसरपंच सुनील प्रभू, सेना नेते प्रभाकर राऊळ, मनोज संखे, सुधीर तामोरे, संतोष मोरे, देवानंद मेहेर, संजय तामोरे, राजू कुटे, भुवनेश्वर पागधरे, जि.प. सदस्य तुळशीदास तामोरे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिली. (वार्ताहर)चारशे परप्रांतीयांना घेतले कामावरबीएआरसीमधील एएसएफएसएफ या प्लांटच्या उभारणीचे काम एल अॅण्ट टी ही कंपनी करीत असून त्या कामाकरिता घिवली गावातील सत्तर कामगारांना कामावर घेतले होते. परंतु, ६ एप्रिल २०१५ पासून सत्तरपैकी वीस कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात येऊन सुमारे चारशे परप्रांतीय कामगार कामावर घेण्यात आल्याचे घिवलीच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
वीस काढले : बीएआरसीच्या कंत्राटी कामगारांचे कामबंद
By admin | Updated: August 24, 2015 23:29 IST