वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या प्रभाग समित्याही जाहीर करण्यात आल्या. गेल्या वेळी ५ प्रभाग समित्या होत्या, त्या आता ९ झाल्या आहेत. एकूण ११५ प्रभाग असलेल्या महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ११ ते १३ प्रभाग असणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत २६ प्रभागांची भर पडल्यामुळे प्रभाग समित्यांची संख्याही वाढेल, असा सर्वसाधारण अंदाज होता. गुरुवारी झालेल्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रभाग समित्यांची संख्या ४ ने वाढली असून एकूण ९ प्रभाग समित्यांच्या माध्यमातून आता विकासकामे केली जाणार आहेत. प्रभाग ‘अ’मध्ये विरार पश्चिम भागातील प्रभागाचा समावेश आहे. प्रभाग ‘ब’मध्ये विरार पूर्वेचा भाग, प्रभाग ‘क’ चंदनसार व चांदीप क्षेत्र, प्रभाग ‘ड’ व ‘ई’मध्ये - नालासोपारा पूर्व व पश्चिम भाग व प्रभाग समिती मुख्यालय, प्रभाग ‘फ’ धानीव व पेल्हार, उर्वरित ३ प्रभागांमध्ये नवघर-माणिकपूर, बऱ्हाणपूर, चुळणे, नवघर पूर्व, वसई पारनाका, नायगाव, जूचंद्र, वालीव, गोखिवरे आदी परिसराचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वसई-विरारच्या विकासाची नवी योजना
By admin | Updated: August 21, 2015 23:23 IST