- वसंत भोईर, वाडातालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि मागणीचा विचार करून महावितरणने कोंढले येथे २०११ मध्ये ४०० के.व्ही.ए.च्या वीज उपकेंद्राला मंजुरी देऊन याच वर्षी त्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या कामाची मुदत संपून गेली तरी ते काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे कुडूस परिसरातील उद्योजक व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सदस्या अंकिता दुबेले यांनी केली आहे.वाडा तालुक्यात ‘डी प्लस’ झोनमुळे उद्योगधंदे वाढले. वांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार पडत होता. तसेच गावागावांच्या वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे विनावीज राहत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने येथे ४०० के व्ही उपकेंद्राला मंजुरी दिली. २०११ मध्ये १९.७५ हेक्टर जागेवर २२ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर महावितरणकडून या कामाचा ठेका ४२० कोटींना ज्योती स्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला. या कंपनीने एक वर्ष हे काम अर्धवट केले. त्यानंतर, मुदत संपून आता ४ वर्षे झालीत, तरी काम बंद आहे. या उपकेंद्रातून वीज मिळेल, या आशेवर तीनशेपेक्षा जास्त उद्योजक आपली कंपनी सुरू करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कंपन्या बंद आहेत. शिवाय, या परिसरातील विजेच्या लपंडावाने येथील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत.अन्यथा आंदोलन हाच मार्ग...या वीज उपकेंद्राचे घोंगडे भिजत राहिल्याने उद्योजकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. म्हणून महावितरणने याची तत्काळ दखल घेऊन उपकेंद्राचे हे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा अंकिता दुबेले यांनी दिला आहे.पावसाळ्याचे कारण : यासंदर्भात महावितरणचे वाड्याचे उपअभियंता लक्ष्मण राठोड यांच्याशी संपर्क साधला असता हे काम महाट्रान्समिशनकडे सोपविले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, महाट्रान्समिशन कल्याणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए.वाय. सुरालकर यांच्याशी संपर्क साधला असता पावसाळा असल्यामुळे इलेक्ट्रीकल कामे करता येत नाहीत, तर सिव्हीलची कामे सुरू असल्याचे लोकमतला सांगितले.
कोंढले वीज उपकेंद्राचे भिजत घोंगडे
By admin | Updated: August 24, 2015 23:20 IST