पालघर : ‘संथारा’ साधना हे जैन समाजातील आत्मकल्याणाचे एक पवित्र माध्यम असून राजस्थान उच्च न्यायालयाने या साधनेला ‘आत्महत्या’समपद्धत असल्याचा निर्णय देत या पद्धतीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निकालाने जैन समुदायाच्या भावना दुखावल्याने राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सर्वमान्य तोडगा काढावा, यासाठी सोमवारी जैन सकल संघ, पालघरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.जैन समाजात ७५ ते ९० वयोमानानंतर परमेश्वराच्या चिंतनात एकरूप होऊन समाधीपूर्वक अवस्थेत अन्नत्याग करून ऐच्छिक मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पद्धतीला पवित्र स्थान असून त्याला ‘संथारा’ असे संबोधले जाते. या पद्धतीविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने संथारा ही पद्धत आत्महत्यासम असल्याचा निर्वाळा देत या पद्धतीवर बंदी घातली होती. आत्मकल्याणाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या पवित्र पद्धतीला आत्महत्येसारख्या स्वरूपाची उपमा दिल्याने जैन समाजात नाराजी पसरली होती. प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथांपासून चोविसावे तीर्थंकर भगवान महावीरांपर्यंत सलग चालत आलेल्या या वंशपरंपरागत संस्कृतीला या निर्णयामुळे धक्का बसून ती खंडित होते की काय, या विचाराने जैन समाजात अस्वस्थता पसरली आहे. राज्यपालांनी न्यायव्यवस्था तसेच प्रशासनाच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढावा, यासाठी सोमवारी जैन सकल संघ, पालघरच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनही देण्यात आले. या मोर्चात महाविद्यालयीन तरुण-तरुणी, महिला उपस्थित होते. (वार्ताहर)
‘संथारा आत्महत्या’ : विरोधात जैनांचा मोर्चा
By admin | Updated: August 24, 2015 23:27 IST