सुनील घरत, पारोळभाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत. येथील मजूर १५ दिवसांनी वीट भट्टी, बांधकामव्यवसाय, वसई पश्चिमेतील वाड्या, सागरी भागात मासेमारी करण्यासाठी जात असल्याने पुढील दोन आठवड्यात कापण्या पार पडल्या पाहिजेत. नाहीतर मजूर टंचाई निर्माण होईल म्हणून कापण्या सुरू केल्याचे शेतकरी सांगत आहेत. चालू वर्षी निसर्गराजाने बळीराजाला योग्य साथ दिल्याने चांगले पीक हाती लागले आहे. यामुळे येथील बळीराजा जोमाने कामाला लागला आहे . कापणी करून भारे बांधणी झालेले पीक खळ्याच्या सभोवताली उडवी रचून ठेवण्यात येत असून एक खळे साधारणत: तीन ते चार शेतकरी मिळून करत आहेत. यामुळे झोडणी पर्यंत पिकाचे संरक्षण सांघिक पद्धतीने करता येते. यातून येथील शेतकऱ्यांमध्ये सांघिक भावना रुजत असून पुढे काळाची गरज बनलेल्या सांघिक शेतीसाठी योग्य वातावरण ग्रामीण भागात तयार होत असल्याचे कृषी सहाय्यक अधिकारी अनिल मोरे यांनी सांगितले. यासाठी या भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही सुरु झाले असून खानिवडे येथे शेतकऱ्यांचा एक गट बनवण्यात आला आहे .
वसईतील शेतकऱ्यांची सुगी
By admin | Updated: November 9, 2016 03:35 IST