वसई : वसईतील एका राजकीय नेत्याकडून हप्ता मागणाऱ्या वाहतूक पोलिसांची पालघर मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरु करण्यात आली असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. वालीव नाक्यावर वाहतूक पोलीस असलेल्या नारायण चौगुले यांनी बविआच्या भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष वामन शेळके यांच्याकडे हप्ता मागितला होता. एका गाडी चालकाने हप्ता न दिल्याने त्याच्यावर कारवाई केली होती. याप्रकरणी शेळके यांनी मध्यस्थी केली असता असंसदीय भाषेत बोलत चौगुले यांनी शेळके यांच्याकडेच हप्त्याची मागणी केली होती. याप्रकरणाचे संभाषण असलेली क्लीप लोकमतच्या हाती लागली होती. त्यानंतर लोकमतमधून चौगुले आणि वसईतील वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्याची दखल पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी दखल घेत चौगुले यांची वाहतूक शाखेतून उचलबांगडी करीत पालघर मुख्यालयात रवानगी केली. चौगुले प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती शारदा राऊत यांनी दिली. दरम्यान, चौगुले वाहतूक शाखेत गेली अनेक वर्षे कार्यरत असून वालीव नाक्यावरच ठाण मांडून बसले होते. त्यांनी कारवाईच्या नावाखाली वाहन चालकांची लूट चालवली होती. वाहतूक शाखेत अनेक पोलीस गेली अनेक वर्षे एकाच नाक्यावर ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यामुळे अवैध वाहतूकीला उत आला आहे. त्यासाठी चौगुले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराला अंकुश बसेल, असे शेळके यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
वादग्रस्त चौगुलेची उचलबांगडी
By admin | Updated: April 19, 2017 00:07 IST