वसई : काम देण्याच्या नावाखाली वसई विरार महापालिकेकडून महिला बचत गटांची पिळवणुक सुरु असून वेठबिगरासारखे राबवून घेणाऱ्या या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उत्तरांचल वेल्फेअर असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.वसई विरार महापालिकेच्या मालकीची १३८ उद्याने असून त्याच्या देखभालीचा ठेका ८३ बचत गटांना दिला आहे. याठिकाणी उद्यानाची दैनंदिन स्वच्छता, उद्यान वेळेत उघडणे-बंद करणे, झाडलोट करणे, वृक्ष छाटणई करणे, दिवे सुरु-बंद करणे, व्यायामाचे साहित्याची देखभाल करणे, उद्यानाची नीट निगा राखणे आदी कामे महिला बचत गटांवर सोपवण्यात आली आहेत. ही उद्याने सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असतात. या सर्व कामांसाठी देण्यात येणारे मानधनही अतिशय तुटपुंजे आहेत, अशी तक्रार असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश सभापती यांनी केली आहे. मानधन देण्यासाठी महापालिकेने उद्यानांची वर्गवारी केली आहे. साडेचार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या उद्यानाला ए प्लस, २ हजार ते साडेचार हजार चौमी उद्यानाला ए, पाचशे ते दोन हजार चौमी उद्यानाला बी आणि त्याखालील उद्यानाला सी वर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीनुसार ए प्लसला ५२ हजार ९००रुपये, ए वर्गाला ३९ हजार ६७५ रुपये, बी वर्गाला २६ हजार ४५० रुपये आणि सी वर्गाला १३ हजार २२५ रुपये मानधन दिले जाते. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. इतक्या कमी मोबदल्यात उद्यानांची देखभाल करणे महिला बचत गटांना अतिशय कठीण होऊ लागले आहे.सर्वात कमी क्षेत्रफळ असलेल्या उद्यानाची देखभाल करण्यासाठी किमान चार माणसांची गरज लागते. सकाळ-संध्याकाळ या दोन्ही वेळच्या कामासाठी चार माणसांना किमान मानधन म्हणून दररोज प्रत्येकी दीडशे रुपये द्यावे लागतात. त्यामुळे महिला बचत गटाला दरमहा १८ हजार रुपये मोजावे लागतात. वर्गवारीनुसार माणसांची संख्या वाढत असल्याने खर्चही वाढतो. त्यामुळे सध्या दिले जाणारे मानधन परवडत नसल्याने महापालिका महिलांची आर्थिक फसवणुक करीत असल्याचा आरोप प्रजापती यांनी केला आहे.
बचतगटांची पिळवणूक
By admin | Updated: March 25, 2017 01:07 IST