विरार : अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात एका दुर्घटनेप्रसंगी बचाव कार्य करताना अग्नीशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले होते. त्यामुळे १४ एप्रिल ते २० एप्रिल संपूर्ण •भारतात अग्नीशमन सेवा सप्ताह पाळला जातो. या सप्ताहानिमित्त वसई-विरार महापालिका अग्नीशमन दलातर्फेही जनतेचे प्रबोधन आणि जनजागृती करून आपातकालिन परिस्थितीत नागरिकांनी स्वत:सह इतरांचे प्राण कसे वाचवायचे? याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली जात आहे. सध्या अग्नीशमन दलाकडे ४० मीटर उंचीपर्यंतच्या म्हणजे १४ मजल्यांपर्यतच्या शिड्या आहेत. त्यांचा वापर उंच इमारतींना लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी चांगल्या प्रकारे होईल. आग प्रतिबंधक चांगल्या दर्जाचा गणवेश, हेल्मेट व्हॅन, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, वॉटर टँकर, आदी साधनसामुग्री आहेत. वसई-विरारमध्ये कुठेही आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे अग्नीशमन दल सक्षम आहे. अत्याधुनिक यंत्रणा या दलाकडे आहे.•भूकंप झाल्यास मोठी दुर्घटना घडल्यास, इमारत कोसळल्यास, झाडातील मांजात पक्षी अडकल्यास आदींवर मात करण्यासाठी वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल नेहमीच तत्पर असते. त्यासाठी जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते.अग्नीशमन दल केवळ आग विझवत नाही तर आगीच्या घटना घडू नये यासाठीही जनजागृती करते. नव्याने येणारे कारखाने, कंपन्या, इमारती, कार्यालये, उद्योग, व्यवसाय आगीच्या दृष्टीने सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.गणवेश आणि यंत्रसामुग्रीबाबत महापालिका, प्रशासन, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कायम सकारात्मकता दाखवली आहे. वसई-विरार महापालिका अग्नीशमन दल हे मनुष्यबळ, कर्तृत्त्व, कौशल्य आणि यंत्रणा याबाबत नेहमीच वरचढ आहे. कर्मचारी, अधिकारी यांची कमतरता नाही. अग्निशमन सप्ताहात सेवांची माहिती व जनजागृती करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आग लागल्यावर आधी काय करावे, काय दक्षता घ्यावी, फायरब्रिगेड येईपर्यंत कोणते उपाय करावेत, अशी माहिती नागरिकांना दिली जात आहे. (प्रतिनिधी)
अग्निशमन सप्ताहात बोळिंजला प्रात्यक्षिके
By admin | Updated: April 19, 2016 01:34 IST