पंकज राऊत, बोईसरमैदान वाचविण्याकरिता सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बोईसर बंदला गुरुवारी १०० टक्के यश मिळाले. शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते, तर सेनेने आयत्या वेळी बंदमधून माघार घेऊनही नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी प्रथम बोईसर रेल्वे स्थानकासमोर धरणे धरले. त्यानंतर, उड्डाणपुलावर रास्ता रोको करून आंदोलकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक मारली. त्याच वेळी चर्चेसाठी संध्याकाळी संघर्ष समिती व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलविल्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला. त्यानुसार, संध्याकाळी संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री यांची धावती भेटही झाली. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.मैदान (प्लॉट) उद्योगाला विकण्याचा एमआयडीसीचा घाट १४ मे २०१० रोजी मोठे जनआंदोलन करून हाणून पाडला होता. त्यानंतर हा प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात येईल, असे आश्वासन एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देऊनही तो प्लॉट रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाला विकण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खैरापाडा, बोईसर व सरावली या तीन ग्रामपंचायती तसेच सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मैदान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एमआयडीसी विरोधात लढा उभारून मैदान परत मिळविण्याचा निर्धार केला. आजचे आंदोलन हा त्याचाच एक भाग होता.पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार व एमआयडीसीचे उपअभियंता पाटील मोर्चाला सामोरे गेले. तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनामध्ये पालघरचे खा. चिंतामण वनगा, बोईसरचे आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी आ. मनीषा निमकर, भूमी सेनेचे अध्यक्ष काळुराम धोंदडे, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष विवेक वडे, पालघर जि.प.चे कृषी सभापती अशोक वडे, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, बविआचे प्रशांत पाटील, प्रशांत संखे, अविनाश चुरी, झाकीर साठी, राष्ट्रवादीचे संजय पाटील, वैभव संखे, काँग्रेसचे राजेश अधिकारी व चंद्रकांत जाधव, आरपीआयचे सुरेश जाधव व सचिन लोखंडे, शिवसेनेचे नीलम संखे, आदी उपस्थित होते. बंद पाळूनही हाती फारसे काहीही न लागल्याने आंदोलन अधिक तीव्र करायला हवे अशी प्रतिक्रिया जनतेत उमटते आहे.गुरुवारी सकाळी आंदोलनस्थळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी समर्थकांसह उद्योगमंत्र्यांबरोबर चर्चा केली असता त्यांनी सात दिवसांत संघर्ष समिती, सर्व राजकीय पक्ष व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. तसेच त्यांनी हा बंद मागे घेण्याची केलेली विनंती मान्य करून सेनेने या बंदमधून माघार घेतल्याचे सांगितले. परंतु, मैदान वाचविण्याच्या मागणीस समर्थन असल्याचे सांगितले. मात्र, उद्योगमंत्र्यांनी बैठक अगोदरच घेऊन ठोस निर्णय न दिल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची भूमिका उपस्थितांनी घेतल्यानंतर आजचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असे समितीने स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत गुरुवारी संध्याकाळी संघर्ष समितीची मंत्रालयात धावती भेट झाली. या संदर्भातील विषय माझ्यापर्यंत आला असून त्या संदर्भातील फाईल मागवून अधिक माहिती घेऊन मी त्वरित निर्णय घेईन असे त्यांनी सांगितले. या वेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आ. विलास तरे, माजी आ. मनीषा निमकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव अर्चना वाणी, बविआचे प्रशांत पाटील, प्रशांत संख्ये काँग्रेसचे राजेश अधिकारी उपस्थित होते.
बोईसर १०० टक्के बंद
By admin | Updated: August 21, 2015 02:16 IST