तलवाडा : बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी अजुनही विक्रमगड तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील आदिवासिंकडुन धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी, पंरपंरा, प्रथा जपण्याचा व पारंपारिक पध्दतीने सण साजरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ यंदा तालुक्यात दोन हजार होळी उभारण्यात येणार असुन प्रत्येक घरातून होळी मातेची विधीविध पुजा केली जाणार आहे़ तर दुसऱ्या दिवशी धुळवडीचे रंग उधळुन हा उत्सव साजरा केला जाणार आहे़ त्याचप्रमाणे शहरीभाग सोडला तर बहुतेक सर्वच गाव, खेडयांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे़होळीनिमीत्त महिलांनी तांदळाच्या पीठापासून दोन दिवस आगोदरच तयार केलेल्या पापडयांचा होळीला व पूजेचे दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो़ होळीसाठी लहानमुले तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे, पेंढा, गवत, बांबु गोळा करुन गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा) ठेवुन दिले जाते़ ग्रामीण भागातील आदिवासी महिला रात्री चंद्र उगवल्यानंतर नटुनथटुन तर लहान मुले गळयात सारखरगाठया (साखरेची माळ) घालुन ढोल ताशांच्या गजरात आरत्या घेवुन गावाच्या मध्यभागी सगळे जमतात़ नविन लग्न झालेल्या आदिवासी जोडप्याने एकमेकांचे हात पकडुन होळी भोवती मोठ मोठया आरोळया देत गोल होळी भोवती फिरुन संसाराला अग्नीपासुन सरंक्षण दे, आमचा राग, द्वेश, लोभ, मत्सर या आपल्या आग्नीत जळुन खाक होवुन दे, अशी मनोभावे प्रार्थना होळीभोवती प्रदक्षिणा घलतांना केली जाते़ होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात आदिवासी रात्रभर ढोलनाच, तारपानाच, गरबानृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात़ या दोन दिवसांत होळीच्या व धुलवंडीच्या दिवशी घरोघरी गोड पुरणपोळया केल्या जातात़ धुळवडीला मनसोक्त धुळवड खेळली जाते़ तर रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासुन तयार केलेला नैसगिग रंगच वापरला जातो़
विक्रमगडमध्ये २ हजार होळ्या
By admin | Updated: March 23, 2016 01:56 IST