वर्धा : व्यसन प्रत्येकासाठी घातकच असते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगा केला पाहिजे. मानसिक ताणतणाव हेच व्यसनाचे मुख्य कारण आहे. युवा वर्गही व्यसनाकडे वळतो. व्यसनामुळे स्व-शरीरासह समाजमनावरही त्याचा विपरित परिणाम होतो. व्यसनामुळे मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक हानी होते. यामुळे सर्वांनीच व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जि.प. समाज कल्याण विभागच्यावतीने तसेच नशाबंदी मंडळ यांच्या सहकार्याने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह घेण्यात आला. सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके तर अतिथी म्हणून विशेष अधिकारी दीपा हेराळे, ज्ञानेश्वर येवतकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य बाबा शंभरकर आदी उपस्थित होते. कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूपाली कोरडे, रोशनी मडावी, रोहन पिंपळकर, आशिष अंबुलकर, अमोल, महिंद्र, प्रांजल, नेहा तसेच अॅड. पूजा जाधव, विशाल उराडे, तुकाराम घोडे महाराज, नितेश कराळे, अविनाश सोमनाथे, प्रज्ञा ब्राह्मणकर, मयूर धरणे, दौलत पवार, डॉ. सागरसिंह कच्छवाह, आशिष कुबडे, रामेश्वर सदाफळे आदींनी पथनाट्याद्वारे व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. जि.प. समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके यांनी व्यसनापासून सर्वांनी दूर राहणार आणि इतरांनाही व्यसन करू देणार नाही, याबाबत सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश कोंडे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली. व्यसनमुक्ती सप्तामध्ये जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात पोहोचून जनजागृती करण्याचा प्रयत्न जि.प. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आला. यास युवकांचाही प्रतिसाद लाभला.(स्थानिक प्रतिनिधी)जि.प. समाज कल्याण विभाग, नशाबंदी मंडळ आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. युवकांनीच पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनीही यातून व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून कुठलेही व्यसन व्यक्तीला कसे लाचार करते, हे ग्रामस्थांना समजावून सांगितले. दारू ही सर्वात वाईट असून ती कशी जीवनाचा नाश करते, यावरही पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
युवकांनी व्यसनापासून दूर राहावे
By admin | Updated: October 20, 2015 02:50 IST