घोराड : यंदा पावसाचे दडी मारणे शेतकरी वर्गाला खूपच महागात पदले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले विहिरीच्या पाण्याने पिकांना ओलित करीत आहे. परंतु वीज वितरणच्या अघोषित भारनियमनामुळे ओलितास अडचणी येत असल्याने घोराड परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहे.गत आठवडा भरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. पंधरा दिवसांपासून श्रावणसरी या भागात बसरलेल्याच नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आधीच हतबल झाले आहे. ओलीताचे साधन असलेले शेतकरी पिके जगविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असले तरी विविध कारणे समोर ठेवून महावितरणकडून अघोषित भारनियमन केल्या जात आहे. त्यामुळे पाणी असतानाही हतबल होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ब्रेकडाऊन, इमरजसी, जम्परफाल्ट आदी शब्दाचा वापर करून लाईनमन ते अभियंता शेतकऱ्यांना समजावत आहे. मात्र रोज हे शब्द ऐकून शेतकरी आता त्रस्त झाला आहे. कर्मचारी कमी आणि रोहित्र जास्त अशी अवस्था असल्याने आता भ्रमणध्वनी उचलण्यासही टाळाटाळ केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.भारनियमनाच्या वेळे व्यतिरिक्त हे भारनियमन सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाच्या उद्रेकाला वीज वितरण कंपनीला समोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहे. त्यांच्या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे. केळझर फीडर वरुन घोराडच्या कृषीक्षेत्रात वीजपुरवठा केला जातो. पण या रोहित्रापर्यंत सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.(वार्ताहर)
अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त
By admin | Updated: August 20, 2014 23:43 IST