पुलगाव : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या माध्यमातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना तात्काळ सेवा पुरवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली़ गत दीड महिन्यांत १५ रुग्णांनी याचा लाभ घेतला; पण या रुग्णवाहिकेबाबत सामान्य नागरिकांना माहिती नसल्याने जनजागृतीची गरज भासत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात ७८८ आधुनिक रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. यापैकी वर्धा जिल्ह्यात ११ तर स्थानिक ग्रामीण रुग्णालयास दीड महिन्यापुर्वी एक रुग्णवाहिका मिळाली आहे. अपघात, गर्भवती महिला, हृदयविकार, साप चावलेले अथवा अन्य गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यास मदत होत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीने १०८ हा दूरध्वनी डायल केल्यास रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविली जाते. वाहिकेत प्राणवायू, रक्तपुरवठा, पल्सरेटींग मशीन, वातानुकूलीत व्यवस्था आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णासोबत दोन डॉक्टरची व्यवस्था असते. चालक सदैव तत्पर असतात. यामुळे रुग्णास नेताना त्रास झाला तर वाहिकेतच त्यास उपचार मिळतो. त्यास भरती करण्यास संपूर्ण सहकार्य केले जाते़ वाहिकेची यंत्रणा विभागाच्या मुख्य कार्यालय पुणे येथे संगणकाद्वारे जोडली असून प्रत्येक हालचालीची नोंद होते़ परिणामी, गडबड होत नाही; पण १०८ व्यवस्थेची फारशी माहिती नाही. दवाखान्यात पत्रके लावली, नातलग वेळप्रसंगी रुग्णवाहिकेसाठी इतरत्र धावपळ व पैशाची तडजोड करताना दिसतात. यात बराच वेळ जात असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यामुळे कर्मचाऱ्यांनी वेळीच रुग्णांना माहिती देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
अत्याधुनिक वाहिकेबाबत रुग्ण अनभिज्ञ
By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST