वर्धा : संत गजानन महाराजांची पायी दिंडी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायदळ आषाढी वारी बरबडी (वर्धा) ते पंढरपूर या पालखीला वारकऱ्यांच्या साथीने सुरवात झाली. ही दिंडी १४ जून ७ जुलै असा २५ दिवसांचा प्रवास करीत पंढरपूरला पोहचणार आहे. वारकरी भक्ताचे एकत्रीकरण व आपली संस्कृती जोपासण्याची कामना मनात घेऊन पाचशेच्या जवळपास वारकरी भक्तांनी दिंडीत प्रवेश केलेला आहे. दरम्यान सकाळी ह.भ.प.विष्णुपंत महाराज कोल्हे यांनी वारकऱ्यांना संबोधित करुन काकडआरती, भजन, कीर्तन करुन भाविकांच्या सहभागाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये परिसरातील धानोरा, मांडवगड, भुगाव, नांदोरा, चितोडा, सेवाग्राम, मसाळा, वरुड येथील वारकरी मंडळींनी सहभाग घेतला आणि पंढरपूरला पायदळ प्रस्थान केले. यादिंडीचे आयोजक अध्यक्ष बंडूभाऊ वाळके, उपाध्यक्ष मुर्लीधर मुडे, सचिव सचीन महाराज देशमुख आणि समस्त गावकऱ्यांनी सहकार्य करीत दिंडीची रवानगी केली. राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी दिंडीकराना शुभेच्छा दिलेल्या आहे.(शहर प्रतिनिधी)
बरबडी ते पंढरपूर पायदळ वारीला सुरुवात
By admin | Updated: June 18, 2014 00:22 IST