गावकऱ्यांची मागणी : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : पडेगाव ते निमगाव हा रस्ता शेतकऱ्यांना ये जा करण्याकरिता महत्वाचा आहे. निमगाव येथे जाण्यासाठीही हाच मार्ग आहे. या मार्गावर जवळपास पन्नास शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे हा मार्ग शेतीच्या वाहीवाटीसाठी महत्वाचा आहे. मात्र रस्त्याचे खडीकरण नसल्याने पावसाळ्यात त्याचे रूपांतर दलदलीत होते. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ खडीकरण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जि. प. सीईओंना निवेदनातून केली. पावसाळ्यात या मार्गावरील गाळात फसून आतापर्यंत अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनाही जीव धोक्यात घालून या रस्त्याने वहिवाट करावी लागते. सतत पाऊस असेल तर हा रस्ता काही काळ बंदच राहतो. शेतकऱ्यांना वाहिपेरी करणेही कठीण जाते. दहा वर्षांपूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकला होता. तेव्हापासून रस्त्याकडे कुणी ढंूकुनही पाहिले नाही. तीन महिन्यात रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास साखळी उपोषण व नंतर आमरण उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी निवेदनात व्यक्त केला. शिष्टमंडळात संजय पहाडे, गजानन शेंडे. नकूल साठोणे, मोरेश्वर आंबटकर, विजय शेंडे, पेटकर आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)
पडेगाव ते निमगाव रस्त्याचे खडीकरण करा
By admin | Updated: July 30, 2016 00:30 IST