लालसिंग ठाकूर - गिरडयेथील शेख फरीद बाबांचा दर्गा टेकडीवर गावापासून २ कि़मी. अंतरावर आहे. या दर्ग्याला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक मानले जाते. विदर्भासह उर्वरीत महाराष्ट्र, आंध्र व मध्यप्रदेशातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. शुक्रवारी येथे मोहरमनिमित्त यात्रा भरणार असून भाविकांचे येणे सुरु झाले आहेत. या यात्रेत विविध धर्मांचे लोक एकत्र येतात. हे या यात्रेचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. हा दर्गाह नागपूर-चंद्रपूर या मार्गावर जामपासून २२ कि़मी.वर आहे. राज्य मार्ग २५८ पासून टेकडी लागून आहे. या टेकडीवर महान सुफी संत बाबा फरीद यांचे वास्तव्य होते. ज्यामुळे फरीद बाबाच्या नावाने याची ओळख आहे. या फरीद बाबाच्या काही हिस्याला मुताबिक बाबा काबुलचा राजा फारूख शाह यांचे वंशज होते. यांचा जन्म ११७३ मध्ये मुलताना येथील खेतनाला गावी झाला. त्यांच्या आई-वडीलानी त्यांचे नाव मसउद ठेवले होते. त्यांना सुफी फरीउद्दीन मसउद नावाने ओळखले जायचे. लहानपणी बाबा फरीद गावातून भिक्षा मागायचे व टेकडीवर राहायचे. या संताने १२४४ मध्ये येथे तपश्चर्या केली. आज लाखो भक्त येथे येतात. बाबा फरीद यांना वृक्षाचे प्रेम होते. बाबा एक दिवस वृक्ष तोडणाऱ्यास म्हणाले, खांद्यावर कुऱ्हाड व डोक्यावर पाणी घेवून तुम्ही झाडे तोडता आणि मी या झाडाचा आधार घेत चिंतन करतो, तुम्ही झाडाला कापून जाळता, असे म्हणून त्यांनी त्यावेळी वृक्षाचे महत्त्व समजावून सांगितले व रक्षण करण्याचा संदेश दिला. त्यांचे हरणावर खूप प्रेम होते. त्यांना तहान लागली असता ते विहिरीवर गेले. त्यांनी म्हटले माझ्याजवळ बाल्टी-दोरी असती तर मी पाणी काढले असते. त्याचवेळी तेथे हरणाचा कळप आला. त्याचक्षणी पाणी जमिनीवर आले व हरणाची तहान भागली. ते जंगलात गेले. बाबा विहिरीजवळ गेले तर पाणी आतमध्ये गेले, अशी आख्यायिका आहे. प्रत्येक माणसाच्या जन्माबरोबर मरण आहे. असेच एक वेळा बाबा जेवण करत असताना टेकडीवर एक राक्षस आला. तो जेवण मागत होता. देऊनही तो नंतर बाबाला पाणी मागत होता. तेव्हा त्यांनी कुबडी मारून पाणी काढले. तेथे आता भव्य तलाव आहे. यावरही राक्षसाचे समाधान झाले नाही. तो बाबाला खातो म्हणाला तेव्हा त्याला बाबाने उचलून १ कि़मी. अंतरावर फेकून दिले, अशीही आख्यायिका आहे. आजही त्या राक्षसाची उलटी समाधी असून त्याला ‘गिडोबा’ या नावाने ओळखून त्याची प्रथम पूजा होते. बाबा साकरबाउली येथे एका झाडाखाली ध्यानास बसले असता तेथून काही व्यापारी किराणा घेऊन जात असता बैलगाडीत काय आहे असे विचारले असता त्यांनी दगड आहे, असे म्हणाताच ते दगड झाले व बैलगाड्या चालत नसल्याने त्यांनी त्या शेतात खाली करून निघून गेले. आजही तेथे नारळ, बदाम, खारक, सुपाऱ्या, लवंग विलायचीच्या स्वरूपात आहे. भाविक त्यांना नेवून त्याचा श्रद्धेने औषधोपचार करतात. त्यांनी तपश्चर्या केलेल्या साकरबाउली दर्ग्यातील विहिरीचे पाणी साखरेसारखे गोड असून त्या पाण्यापासून आजही भाविक मलिदा बनवून वाटतात. गिरड, टेकडीवर निसर्गरम्य परिसरात आठ एकरात आवारभिंत, भक्त निवास, भोजन निवास, तलाव, झाडे, मंदिर आहे. गिरडपासून ३ कि़मी.वर साकरबाउली दर्गा आहे. उमरेड रोडवर कुबडी इमली दर्गा आहे. येथे वानरे आकर्षण आहे.
शेख फरीद बाबा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक
By admin | Updated: October 30, 2014 22:55 IST