वर्धा : जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख, वडगाव (जं.), शिवणगाव, मेनखत, वडगाव (खु.), वडगाव (कला), जुवाडी, धानोली (गावंडे), नानबर्डी, अंतरगाव, जुनगड येथे शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ शिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या आंदोलनाची माहिती देण्यात आली. ‘बुद्धं शरणम गच्छामी’ हा अद्यावत संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच दिला. तो संदेश आज अधिक उपयुक्त असल्याचे आपल्याला जाणवत आहे. समाजात समता विकसित करण्यासाठी स्वतंत्र चिंतनाची गरज आहे. बुद्धीच्या प्रगल्भतेशिवाय ते शक्य नाही़ म्हणून बहुसंख्येचे बुद्धी व विज्ञाननिष्ठ व्यापक समाजमन झाले तरच मानवी मुल्यांची प्रतिष्ठापना होईल, असे मत किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी व्यक्त केले. ज्यांचे प्रश्न कुणीही सोडवत नव्हते, ते प्रश्न सोडविण्याचा व राजकारणाचा काही संबंध नाही, असे म्हणणार्या तथाकथित नेतागिरी करणार्यांसमोर आव्हान उभारत आहोत. यापूढे केवळ पक्ष, नेता, जात, धर्म, पैसा या सामान्य आमिषाला बळी पडणार्या समाजाने लायकी नसणार्यांना त्यांची जागा दाखवावी. ज्यांना विचारांची व विकासाची दृष्टी आहे, प्रश्न सोडविण्याची तळमळ आहे, अशा प्रज्ञावंत, बुद्धीनिष्ठ, कार्यनिष्ठ, व्यक्तींनाच लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे़ तरच तुम्ही उज्वल भविष्याची अपेक्षा करू शकता, असेही त्यांनी सांगितले़ जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी संघटीत होऊन प्रश्न सोडविला जाऊ शकतो. यामुळे संघटनेच्या शक्तीला बळ द्या व आपले प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. वर्धा तालुकाध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सभेला तुकाराम पुसाम, मधुकर धवणे, विजय भांडेकर, माणिक पंधराम, विनोद उरकुडे, श्रीकांत गावंडे, वंदना मून, निर्मला वाघ, संजय मसराम, प्रकाश करनाके, विकास उमाटे, किशोर पाटील, एकनाथ येळणे, मनोहर भांडेकर, अनिल टेकाम, संजय मसराम, अमीत वानखेडे, गोविंद कुमरे, लक्ष्मण ठाकरे, सुरेश नेहारे, मधुकर कुकडे, सिद्धार्थ मानकर, राजेंद्र उडाण, गंगाधर येलोरे, सुनील पिंपरे, सुनीता वैरागडे, कमला उईके, अर्चना चलाख, अरुण वैरागडे आदी उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)
प्रबोधनाकरिता जनजागृती रॅली
By admin | Updated: May 19, 2014 23:50 IST