मोझरी (शे़) : नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़ यात अस्मानी व सुलतानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या परिक्षेत्रातील वनकर्मचारी या जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़तुम्ही वाहत असलेल्या जमिनीचा पट्टा वनविभागाच्या क्षेत्रात आहे़ तुम्ही जमिनीचा ताबा सोडा, असे वनकर्मचारी सांगत आहेत़ हे वाक्य ऐकून कुडमते यांना धक्काच बसला़ निरक्षर असलेले सखाराम कुडमते हे गत ३५ ते ४० वर्षांपासून सदर जमिनीवर शेती करीत आहे़ गावस्तरावर वनहक्क समितीच्यावतीने ही जमीन कुडमते यांना वाहू देण्यात यावी, या ठराव पारित करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे़ तो प्रस्तावित असल्याचे समजते़ २००९ मध्ये ग्रा.प. प्रशासनानेही याबाबत नाहरकत दिले आहे़ २०११ मध्ये जिल्हा वनहक्क समितीकडे अर्ज सादर करण्यात आला होता; पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. शिक्षणाचा गंध नसलेले सखारामजी पारंपरिक पद्धतीने ०.८९ आर जमीन गत ३५ ते ४० वर्षांपासून कसत आहे़ नापिकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढून शेतकरी आत्महत्या वाढत आहे़ यातच शासकीय कर्मचारी निरक्षर आदिवासी शेतकऱ्यांचे उदनिर्वाहाचे साधन हिसकावत असतील तर शेतकऱ्याने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ सदर परिक्षेत्राचे वनकर्मचारी गत काही दिवसांपासून वरूड येथील शेतकरी कुडमते यांना शेताचा ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़(वार्ताहर)
शेताचा ताबा सोडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून दबाव
By admin | Updated: June 20, 2014 00:01 IST