आर्वी : उपविभागात असलेल्या रेतीघाटावर नेहमी होणाऱ्या अवैध रेती उत्खननातून महसूल विभागाचा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल बुडतो. यावर आळा घालण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक तालुक्यात उपविभागीय महसूल अधिकारी व पोलीस विभागाचे संयुक्त पथक तयार केले आहे. सदर पथक रेती घाटावर आता करडी नजर ठेवणार आहे. रेतीघाटावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी तसेच दर तासाच्या माहितीची नोंद होणार आहे. गत काही वर्षात रेती घाटावर अवैध रेती उत्खननाचे प्रकार वाढले आहे. यामुळे महसूल विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. रात्री अपरात्री रेती घाटावर गाड्या व ट्रक्टर लावून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी होत होती. यात महसूल बुडल्या जात होता. आता यावर नव्याने निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश देऊन पोलीस व महसूल विभागाचे संयुक्त पथक तयार करून अवैध रेती उत्खननावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. यासाठी त्या-त्या गावातील विभागातील रेतीघाटावर अवैध उत्खनन आढळून आल्यास पोलीस विभागात तक्रार करण्याची जबाबदारी पटवारी व ग्रामसेवक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नवीन पथकाच्या माध्यमातून अवैध उत्खननातून शासनाचा बुडणारा महसूल व अवैध रेती उत्खन्नावर प्रतिबंध घातल्या जाणार आहे. तसेच अवैध रेती उत्खन्न करणाऱ्याविरुद्ध पोलीस कारवाई होणार आहे. रेतीच्या वाहतुकीकरिता रेतीघाटावर रेतीची वाहतूक करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या सर्व रेतीघाट बंद असून पुढील महिन्यात रेतीघाट सुरू होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विलास ठाकरे यांनी दिली. रेती चोरी रोखण्यासाठी रेती चोरी करणाऱ्या विरूद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रेती वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेतीघाटांवर पोलीस व महसूल विभागाचे संयुक्त पथक
By admin | Updated: November 23, 2014 23:23 IST