तुळजापूरकर त्रस्त : तक्रारींकडेही दुर्लक्ष वर्धा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. असे असले तरी आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जागेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी, तुळजापूर (वघाळा) येथेही शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पूर्वी शेणाचे खड्डे गावाच्या एका बाजूला राहत होते. त्यासाठी राखीव सरकारी जागा राहत होती; पण सरकारी राखीव जागेवर ग्रामस्थांकडून अतिक्रमण करण्यात आले. शिवाय सरकारी इमारतींचे बांधकाम झाल्याने शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर आले आहेत. शिवाय काही घराशेजारी इंधनाचे ढिग दिसून येतात. यामुळे डासांची उत्पत्ती होत असून सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही वाढली आहे. ग्रामीण भागात कठोर पावले उचलली जात नसल्याने शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देत आहे. तुळजापूर येथे वॉर्ड क्र. तीनमध्ये गुणवंत वैद्य, रामभाऊ मोहदुरे, गजानन जामुनकर यांच्या घरासमोर रस्त्यालगत शेणखताचे आठ-दहा खड्डे आहेत. गट ग्रा.पं. वघाळा तुळजापूर यांना याबाबत निवेदन देऊनही परिस्थिती जैसे थे आहे. २००९ मध्ये निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यात ग्रा.पं. वघाळा तुळजापूरला निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला; पण ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे ते दिवस पुन्हा येणे नाही, असे चित्र आहे. डांबरीकरणावर लोक शौचास बसत असल्याने रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजार पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर)
शेणखताचे खड्डे देताहेत आजारांना निमंत्रण
By admin | Updated: July 13, 2016 02:53 IST