कारंजा(घा.) : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे. म्हणून या योजनेंतर्गत अन्नधान्य वाटप काटेकोरपणे व विना विलंब झाले पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी व्यक्त केले. कारंजा तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेत्यांसाठी सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला तहसीलदार बालपांडे व तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेते, विभाग प्रमुख सचिन गवळी उपस्थित होते. या जून महिन्यात एपीएल धारकांना ९.६० रुपये दराने ४ किलो तांदूळ व ७.२० रुपये दराने ७ किलो गहू, वाटप करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभाग प्रमुख सचिन गवळी यांनी दिली. तसेच १० तारखेच्या आत माल उचलून त्वरीत वितरित करण्याचा सल्ला दिला. तसेच असे करीत नसलेल्या स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.कारंजा तालुक्यात ‘अन्नपूर्णा’ योजनेचे १५५ कार्ड धारक असून त्यांना प्रतिकार्ड १० किलो धान्य विनामुल्य दिले जाईल. तसेच अंत्योदय योजनेचे, तालुक्यात ४ हजार ७५८ कार्ड धारक असून प्रत्येक कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरीत केले जाईल. ४४ हजार रुपयाच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्या कार्डधारकांना प्रती माणसी ५ किलो धान्य मिळत आहे. धान्य सुरळीत मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी, तहसील कार्यालयाला केली आहे. त्याची चौकशी करुन त्वरीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदाराने यावेळी दिली. काही स्वस्त धान्य दुकानदार, आपल्या सोयीनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उशिरा धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही. म्हणून अनेकांना त्याच्या हिस्याचा कोटा मिळत नाही. असा गैरव्यवहार आढळल्यास ग्राहकांनी लेखी तक्रार संबंधित विभागाला करावी अशी माहिती . म्हणजे त्वरीत कारवाई करता येईल, असे आश्वासन जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी जनतेला दिले. यावेळी परिसरातील स्वस्त धान्य विक्रेत्यांची उपस्थिती होती. त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
अन्न सुरक्षा कायद्यावर माहिती
By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST