पुलगाव : वर्धा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर रेती, मातीची वाहतूक करणार्यांकडून चिरीमीरी घेतल्याने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर रेती माफियाविरूद्ध कारवाई करण्यास पोलीस प्रशासन उदासिनता बाळगून असल्याचे दिसते. यामुळे महसूल विभागाचे कर्मचारीही हवालदिल झाले आहेत. गत काही दिवसांपासून रेती माफियांनी शहरात नव्याने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंंत रेतीची चोरी बिनधोक सुरू असते. शहरात जागोगागी रेतीचे ढीग लावले जात आहेत. रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त सुरू असते; पण पोलीस प्रशासन कारवाई करण्याचे सोडून पाठ फिरवित असल्याचे दिसते. गत तीन-चार महिन्यांपासून एकाही रेती चोराविरूद्ध कारवाई केली नसल्याने शासनाचा महसूल बुडाला आहे. यामुळे रेती माफियांचे व पोलीस प्रशासनाचे धागेदोरे तर जुळले नाहीत ना, अशी चर्चा आहे. रेती माफियांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे, हा सवाल पुन्हा ऐरणीवर आला आहे. अलिकडे रेती चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत स्थानिक नायब तहसीलदार, तलाठी यांनी पावले उचललीत; पण पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप महसूल विभागाकडून होत आहे. कारवाई करण्यास गेलेल्या महसूल कर्मचार्यासोबत पोलीस जात नाहीत, स्वत:हून कारवाई करीत नाहीत वा महसूल विभागास कळवितही नाही. यामुळे रेती माफियांवर आळा कसा घालावा, ही नवीनच समस्या महसूल विभागासमोर उभी ठाकली आहे. रेतीचोरी रात्री होत असल्याने जीव धोक्यात घालून पटवारी घाटात जाऊ शकत नाहीत. रेतीमुळे शहरात नवीन गुंडगिरी जन्मास येत आहे. यात काही गंभीर अपराध घडले तरी पोलीस शांत बसतील काय, हा प्रश्नच आहे. वाळू उपसा व मातीच्या खोदकामामुळे जलचर जीवसृष्टी संकटात आली आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
अवैध रेती उपसा सुरूच; पोलिसांचीही चुप्पी
By admin | Updated: May 29, 2014 02:43 IST