वर्धा : महसूल प्राप्त करण्याचे मोठे साधन म्हणून गौण खनिजाकडे पाहिले जाते़ टेकड्या, जमिनीपासून उंच भागातून गौण खनिजाच्या उत्खननाकरिता पट्ट्यांचे वाटप केले जाते़ हे खाणपट्टी शासनाकडून लीजवर दिले जात असून त्याचे ठराविक कालावधीत नुतनीकरण करावे लागते़ जिल्ह्यात कुणालाही न दिलेल्या जमिनीतूनच उत्खनन होत असल्याचे आढळून येत आहे़ यात चोरटे मालामाल होत असले तरी प्रशासनाला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यातील अनेक पठार भागात खदाणीला परवानगी देण्यात आली आहे़ यात केळझर, येळाकेळी, पुलगाव, गुंजखेडा, आगरगाव यासह हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू व वर्धा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे़ खदाणीकरिता संबंधित गावांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविणेही गरजेचे असते़ शिवाय पर्यावरण व भूजल विभागाची परवानगीही गरजेची असते; पण जिल्ह्यात कुठलीही परवानगी न घेता सर्रास गौण खनिजाचे उत्खनन केले जात असल्याचे आढळून येथे आहे़ गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत येणाऱ्या वनविभागाच्या जमिनीवरून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे़ याकडे महसूल प्रशासनासह वन विभागचेही दुर्लक्ष होत आहे़ असाच प्रकार आगरगाव शिवारातही होत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत जिल्ह्यातील गौण खनिज चोरी रोखणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
अवैध गौणखनिज उत्खनन; महसूल पाण्यात
By admin | Updated: January 25, 2015 23:21 IST