हिंगणघाट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची नित्य योजना आखली. यातूनच ग्राम जागृतीची चळवळ उभी झाली. या चळवळीतून निर्माण होणारी शक्तीच गावागावात सत्कर्माची भक्ती समजावी. आणि ती प्रत्येकाने जीवनात आचरल्यास त्यासारखा दुसरा भाग्यवंत नाही, असे मत ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी व्यक्त केले.भारतीय युवा संस्कार परिषद व भारतीय बहुउदेशीय युवा संस्कार मंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने दिवाकर अलोणी स्मृती सेवाभाव पुरस्कार २०१४ रामकृष्ण बेलूरकर, ग्रामगीताचार्य वरखेड यांना प्रदान करण्यात आला. आर्दश एकलव्य शिष्यदिन, गुरूकृतज्ञता सोहळा चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महेश ज्ञानपीठचे संस्थापक माजी नगराध्यक्ष गिरधर राठी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर गांधी विचारक गजानन अंबुलकर, राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊ बेलूरकर, श्याम अलोणी, प्रा. डॉ. उषा साजापूरकर, डॉ. शरद कुहीकर, संस्था सचिव प्रदीपकुमार नागपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, परिषद गौरव चिन्ह, मानपत्र तथा रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. या अगोदर हा पुरस्कार शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया, डॉ. अविनाश सावजी, डॉ. किशोर मोघे, गांधीवादी विचारक श्यामसुंदर शेंडे, अनिलकुमार रूद्रकार, आदी मान्यवरांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी दहावी १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विशेष प्राविण्य व उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श एकलव्य शिष्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यात अनिकेत बोरकुटे, वैष्णवी वझुरकर, पुनम गजरानी, शुभांगी ठाकरे, रविना सॅम्युअल, रेणुका धाईत, प्रतिक्षा कुत्तरमारे, हेमंत जायदे, पियुष उजवणे, रितिका मंत्री, मलक ओसामा मलक वहाब आदी विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. त्याचप्रमाणे गुरूकृतज्ञता म्हणून मंजुषा दौलत सागर, करीम उल्ला खाँ हबीबउल्ला पठाण यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक शरद कुहीकर यांनी केले. संचालन चेतन काळे आणि मनोहर शेंडे यांनी केले. आभार प्रदीपकुमार नागपूरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रसाद साळवे, नईम मलक, गजानन नांदुरकर, नरेंद्र पोहनकर, भीमसागर खैरकर आदींनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)
गावागावात ग्रामजागृती चळवळ निर्माण व्हावी
By admin | Updated: August 6, 2014 23:59 IST