वायगाव (नि.) : गोरगरिबांना धान्य पुरवठा करणार्या स्वस्त धान्य दुकानांतून दहा महिन्यांपासून साखर बेपत्ता झाली आहे. केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जात आहे. यातही केशरी कार्ड धारकाना गत तीन ते चार महिन्यांपासून कोणतेही धान्य मिळाले नाही. यामुळे लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे. वर्धा तालुक्यात साखरेची मागणी असताना गत दहा महिन्यांपासून पुरवठा विभागाने साखरेचे वितरण केले नाही. रॉकेल मिळणेही कठीण झाले असून मागणीच्या प्रमाणात केवळ ४0 टक्के रॉकेलचा पुरवठा व वितरण होत आहे. शहर व ग्रामीण भागासाठी १३ टँकर म्हणजे १ लाख ५६ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला जातो. वास्तविक, शहर व ग्रामीण भागात २५ टँकर म्हणजे ३ लाख लिटरच्या वर रॉकेल आवश्यक आहे. पुरवठा केवळ १३ टँकर होत असल्याने रॉकेलची वितरण व्यवस्था कोलमडली आहे. अन्न सुरक्षा योजना राबविताना शासनाला जुन्या वितरण योजनेचा विसरच पडल्याचे दिसते. बिपीएल व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना गहू व तांदळाचा पुरवठा होतो; पण या धान्यात पूर्वीची गुणवत्ता नसल्याची ओरड होत आहे. वर्धा तालुक्यात १४६ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शहरात ४६ धान्य दुकाने आहे. वर्धा तालुक्यात ५२ हजार ३६५ रेशन कार्डधारक आहे. यानुसार प्रत्येक दुकानदाराला शिधापत्रिकेनुसार धान्यसाठा दिला जात असल्याचे सांगितले जाते. खासगी दुकानात साखरेची किंमत ३४ ते ३५ रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातील १४ रुपये किलो साखर लाभार्थ्यांना परवडणारी आहे; पण दहा महिन्यांपासून साखरेचा पुरवठाच झाला नाही. यामुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातील महागडी साखर खरेदी करावी लागत आहे. गहू व तांदूळाची पतही खालावली. ३-४ महिन्यांपासून लाभार्थी स्वस्त धान्याच्या दुकानात चकरा मारत आहे; पण धान्य मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
चार महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना धान्याची प्रतीक्षा
By admin | Updated: May 29, 2014 02:41 IST