लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूलाचे रूंदीकरण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कित्येक वर्षांच्या मागणीनंतर या पुलाच्या रूंदीकरण कामास प्रारंभ झाला; पण या बांधकामात अडथळ्यांची शर्यतच असल्याचे दितसे. परिणामी, कामाचा वेग मंदावला आहे. अडथळ्यांमुळे उड्डाणपुलाचे बांधकाम आठ महिने झाले असताना संथगतीनेच सुरू आहे. यामुळे मुदतीत पुलाचे रूंदीकरण होणार काय, हा प्रश्नच आहे. वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल रहदारीसाठी अपुरा ठरत आहे. या पुलावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो. उड्डाणपुलाचे रूंदीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून खितपत होती. अखेर मंजुरी मिळाली आणि आॅक्टोबर २०१६ मध्ये कामाला सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला; पण कामाला गती आली नाही. बांधकाम विभागाकडून केवळ आजुबाजुला भिंंती बांधण्यात आल्या तर बोरगाव व सावंगी मार्गावर सिमेंटचे अर्धवट रस्ते बांधण्यात आले. नगर पालिका व महावितरण कंपनीकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड बांधकाम विभागही गप्प बसल्याचे दिसते. अतिक्रमणाचीही मोठी समस्या असल्याचे चित्र आहे. काही नगरसेवक व स्वयंघोषीत लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करून दबाब टाकत असल्याची चर्चा आहे. उड्डाणपूल निर्मितीमध्ये समस्यांचा डोंगर वाढत आहे. बांधकामासाठी केवळ २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आठ महिने लोटल्याने उर्वरित मुदतीत काम पूर्ण कसे होणार, हा प्रश्नच आहे.
उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:11 IST