विजय माहुरे - घोराडग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांतील पटसंख्या दरवर्षी घटत असल्याचे गत काही वर्षांपासून दिसून येत आहे़ यामुळे पूढील काही वर्षांत या शाळा ओस तर पडणार नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे़सेलू पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या १११ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत़ या शाळांत गत शैक्षणिक सत्रात ५ हजार ४९१ विद्यार्थी शिक्षण घेत होते़ सध्या सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रात ५ हजार २५२ पटसंख्या आहे. जवळपास २४२ विद्यार्थ्यांनी संख्या घसरली आहे़ शाळेच्या पहिल्या वर्गात विद्यार्थी संख्या कमी झाली असल्याचे निदर्र्शनास येत आहे़ ३० सप्टेंबर ही पदनिर्धारणाची अंतिम तारीख असल्याने विद्यार्थी संख्येत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे़ असे असले तरी २०० विद्यार्थ्यांनी पटसंख्या कमी होत असल्याने हे शाळा ओस पडण्याचे द्योतकच मानले जात आहे़ १११ शाळांपैकी प्राप्त केलेल्या आकडेवारीनुसार ८ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या आहे़ यात हिवरा, चिंचोली, आलगाव, पिपरी, गोहदा, डोंगरगाव, मेणखत, कामठी या प्राथमिक शाळांचा समावेश आहे़तालुक्यात असलेल्या उच्च श्रेणीच्या शाळा नव्या नियमानुसार प्राथमिक होत आहेत़ उच्च श्रेणी शाळेचा दर्जा हा २०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळांनाच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे़ शाळांच्या सुसज्ज इमारती, विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची सुविधा मिळत असताना अलीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीचा पगडा पालकांच्या मनावर घट्ट बसला आहे़ गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांचा कल बदलला आहे़ जि़प़ शाळांनी शिक्षणाचे दालण गाव-खेड्यात खुले केले़ त्या शाळांतून चांगले विद्यार्थीही घडले व ते उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहे़ राजकारण, समाजकारण यात पुढे आहे़ अशा शाळांकडे बदलत्या परिस्थितीमुळे पाठ फिरवावी, हे चिंतनीय आहे़ शिक्षण विभागाने याचा विचार करणेच अगत्याचे ठरत आहे़
जिल्हा परिषद शाळांत पटसंख्येची घसरण
By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST