वर्धा : बोंडसुला या गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे करण्यात आली़ यावरून मोजणी झाली व अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले; पण अद्याप जमिनीचा ताबा ग्रा़पं़ कडे देण्यात आला नाही़ यामुळे सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांना निवेदन सादर करून जमिनीचा ताबा ग्रा़पं़ कडे सोपविण्याची मागणी करण्यात आली़बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली़ यावरून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत शुल्क अदा करून रितसर मोजणी करण्यात आली़ यात मोहन गिरी यांच्या शेतामध्ये अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले़ भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणीमध्ये ०़४० हे़आऱ शासकीय जमिनीवर गिरी यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले़ या जमिनीवर भूमिलेख कार्यालयाने आखणी करून देत त्याची ‘क’ प्रत ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आली़ यानंतरही सदर शेतकऱ्याने बोंडसुला ग्रा़पं़ ला जमिनीचा ताबा दिलेला नाही़ सदर इसमाचे राजकीय संबंध असल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार सदर व्यक्तीवर कारवाई करीत नसल्याचे ग्रा़पं़ ने नमूद केले आहे़ सरपंच व इतर सदस्यांना बोलवून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे़ शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात ग्रा़पं़ कार्यालयास कुठलीही मदत केली जात नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ गोसावी समाजाने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावा म्हणून बोंडसुला ग्रा़पं़ कडे अर्ज केला आहे़ त्यानुसार ग्रामपंचायतने सदर प्रकरण ग्रामसभेत मांडले आणि सर्वानुमते ग्रामसभेतून गोसावी समाजाला पूर्व-पश्चिम रोडला लागून सर्व्हे क्ऱ २५७ या शेतातून एक एकर जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला़ हा ग्रामसभेचा ठराव तहसीलदार कार्यालयास सादर करण्यात आला; पण तहसीलदारांनी गोसावी समाजाला अद्यापही जागा दिलेली नाही़ हा ग्रामसभेचा अपमान असल्याचेही ग्रा़पं़ प्रशासनाने निवेदनात नमूद केले़ या प्रकारामुळे बोंडसुला येथील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ तहसील प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला सहकार्य केले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ तहसीलदार व वरिष्ठ अधिाकऱ्यांनी चौकशी करून अतिक्रमण काढावे व समस्या सोडवावी, अशी मागणी बोंडसुला ग्रा़ पं़ ने केली़(कार्यालय प्रतिनिधी)
सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवा
By admin | Updated: August 12, 2014 00:05 IST