एक जखमी : व्यापाऱ्यांकडून दगडफेकीचा प्रयत्नवर्धा : येथील नगर परिषदेच्यावतीने शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात शुक्रवारी बाजार परिसरात ही मोहीम सुरू असताना व्यापारी व पालिकेच्या कर्मचाऱ्यांत संघर्ष उद्भवला. दरम्यान झालेल्या शाब्दिक वादात काही व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. याच काळात दुकानासमोर लावण्यात आलेले छत काढण्याकरिता चढलेला एक इसम खाली पडल्याने तो जखमी झाला. शिवचरण मून असे जखमीचे नाव आहे. यावेळी व्यापाऱ्यांचा संताप पाहून कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. तत्पूर्वी परिसरात मोहीम सुरू असताना काही व्यापाऱ्यांना दंड थोटावण्यात आला. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेले साहित्य त्यांच्या वाहनात टाकले असता व्यापाऱ्यांनी ते परत घेत आपापल्या ताब्यात घेतले. हा वाद कायम असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनी नगर परिषदेत जावून पहिले मोठ्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढा, छोेट्यांचे नंतर काढा, अशी मागणी केली. असे असले तरी व्यापाऱ्यांकडून झालेल्या आजच्या प्रकारामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. गत दोन दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. यात पहिले शहरातील मुख्य मार्ग व बुधवारी आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर शुक्रवारी बाजार परिसरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सकाळपासून या भागात मोहीम सुरू करण्यात आली. मोहीम अंबिका चौक परिसरात पोहोचली. येथे काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर बांधलेले ओटे तोडण्याची कारवाई करण्यात आली. यात मरडवार यांच्या दुकानासमोरचा आटा तोडण्याची कारवाई करीत त्यांना दंड ठोठावण्यात आला. ही मोहीम पत्रावळी चौकाकडे वळविण्यात आली असता अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून येथील व्यापारी व पालिकेच्या कर्मचाऱ्यांत शाब्दिक वाद उफाळला. या वादात काही व्यापाऱ्यांनी हातात दगड घेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भिरकावण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्मचाऱ्यांनी येथून काढता पाय घेतल्याने ते थोडक्यात बचावले. हा वाद सुरू असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार दुकानासमोर असलेले छत काढण्याकरिता एक वृद्ध चढला असता त्याचा तोला जात तो कोसळला. यात तो जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सदर मोहीम येथेच थांबविण्यात आली. बाजारात घडलेल्या या प्रकारामुळे पालिकेची ही मोहीम येथेच थांबणार अथवा अशीच सुरू राहणार, या बाबत विचारणा केली असता ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)व्यापारी जखमी४पत्रावळी चौकात हातबंडीवर कपड्याचा व्यवसाय करणारा इसम खाली पडून जखमी झाल्याने वातावरण चिघळले.बाजारातील प्रत्येक व्यापाऱ्याला त्याच्या दुकानासमोर असलेले अतिक्रमण हवे आहे. या अतिक्रमणाचा इतरांना त्रास होत आहे. वाहतूक विस्कळीत होत आहे. हे अतिक्रमण काढण्याकरिता त्यांना नोटीसी बजावण्यात आल्या. तरीही त्यांच्याकडून अतिक्रमण काढण्यात आले नाही. ही मोहीम थांबणार नसून ती अशीच सुरू राहणार आहे.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प.वर्धा
व्यापारी व पालिका कर्मचाऱ्यांत संघर्ष
By admin | Updated: December 12, 2015 04:41 IST