वर्धा : आठवडाभरापासून वातावरणात पसरलेल्या गारठ्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहे. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी खोकला व तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही़ लहान बालके, वृद्ध व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व दिवसा काहीसा उकाडा अशा वातावरणातमुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे विषाणूजन्य आजारातदेखील मोठा प्रमाणात वाढ झाली आहे़ आधीच श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अती त्रास होत आहे़ गावागावातील प्राथमिक स्वास्थ केंद्र, खासगी रूणालये रूग्णांच्या संख्येमुळे खच्चून भरले आहेत़ सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी अनेकदा रुग्णांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे झाले आहे़ यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने नागरिक बेजार
By admin | Updated: December 22, 2014 22:53 IST