गौरव देशमुख - वर्धा तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. वास्तविकतेत ही गंगा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. येथील वर्धा-वायगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अनेक चिमुकले पाटी-दप्तर सोडून आपल्या आई वडिलांसह दगड फोडण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. या चिमुकल्यांना शाळेत दाखल करून घेण्याच्या सूचना असताना याकडे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तर बालमजुरी रोखण्याकरिता असलेल्या समितीने याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. वडर समाजाची बोलीभाषा, वेशभूषा, चालिरिती इतर समाजापेक्षा वेगळी असल्याने ते कुणात मिसळत नाहीत. यामुळेच हा समाज विखुरलेला असून पोटाची भूक मिटविण्यासाठी ते आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात भटकत आहेत. सततच्या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण मिळत नाही़ आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी ते सामूहिक पद्धतीने रस्त्याच्या कामावर दगड फोडण्यासाठी जातात़ हा समाज काम असलेल्या ठिकाणी झोपड्या बनवून राहतो़ त्याची लहान मुले रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाखाली राहतात व साधारण वयाची मुले आई वडीलांना दगड फोडणीसाठी मदत करतात.
दगड फोडणाऱ्यांची मुले शिक्षणपासून वंचित
By admin | Published: January 25, 2015 11:20 PM